चवी न फुटकळ असती माझ्या
ध्यास आसेतुहिमाचालाचा
कवी न अटकळ बांधण्याचा
ब्रम्हांडाच्या आपोषणाचा
जोडले जे वेगळाले
कधीच नव्हते झाले ते
घटाकाश तुट-फुटोनी
आकाशाशी जडले नाते
हरवले नव्हतेच काही
हरवल्याचा भास होता
समरसतेला अडचण फक्त
मी अन माझा श्वास होता
सतत अविरत ध्यासाने
मन आताशा पालटले
तेच डोळे तीच दृष्टी
फक्त बघणे वेगळे
तीच वही अन लेखणीही
तोच मी अन तेच शब्द
मात्र हाताशी आज माझ्या
जिंकिलेले हे प्रारब्ध

Comments
Post a Comment